नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
संपदा कुलकर्णी गिरगावकर
Abstract
साहित्याच्या सर्वच प्रांतात निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकरांच्या नाट्यसंहितांचे प्रयोग प्रेक्षकांनी पाहून तृप्तीचे समाधान मिळवले. नट, दिग्दर्शक, निर्माता यांना आव्हान वाटणाऱ्या संहितांचे प्रयोग म्हणजे सावरकर यांची नाटके होत. नाटक या व्यामिश्र साहित्यिक घटकातून सावरकरांनी प्रेरणादायी विचार मांडले आहेत. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतिप्रवण करणारे आहेत. 1927 संगीत उःशाप हे पहिले नाटक सावरकरांनी लिहिले. त्याचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण झाले पाहिजे हा आहे. संत चोखोबांच्या चरित्राचे सहाय्य घेऊन हे नाटक लिहिले आहे यात संत चोखामेळा, त्याचा शिष्य किसन, त्याची बहीण कमलिनी, तिचा प्रियकर शंकर अशी प्रमुख पात्रे आहेत. अस्पृश्यांचा होणारा अपमान सहन होत नसल्याने शंकर मुसलमान होतो आणि किसनलाही तो मुसलमान होणे लाभदायक असल्याचे सतत सांगत असतो. पण किसन हिंदूधर्म न सोडण्यासाठी पक्का असतो. मुसलमान झालेल्या प्रियकराला कमलीनी स्वीकारण्यास नकार देते आणि एका नाटकी प्रसंगात त्याला ठार करते. असे या उःशापचे कथानक आहे. हे नाटक नाट्यकला प्रसारक मंडळीने रंगभूमीवर आणले.
